ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे; संजय राऊतांनी थेट नावं सांगितली 

मुंबई :  राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा (Dhananjay Mahadik) विजय झाला आहे. विरोधीपक्ष नेते  देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis)  यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर  बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी थेट प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला मतं न देणाऱ्यांची नावं जाहीर केली आहेत. आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. घोडेबाजार उभे होते त्यांची सहा सात मतं आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही. आणि कुठला व्यापार केला नाही. तरीही संजय पवार (Sanjay Pawar) यांना पहिल्या पसंतीची 33 मतं मिळाली. हा सुद्धा आमचा एक विजय आहे.

ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी (Fraud) केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीचे (BVA) तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.  घोडेबाजारातील घोड्यांमुळं सरकारवर फरक पडणार नाही. फार हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, हरभरे अपक्षांनी खाल्ले आहेत, असा टोलाही राऊतांनी विरोधकांना लगावला.