मनोहर भिडेंवर प्रतिबंधात्मक कारवाई का नाही? अशोक चव्हाण यांचा संतप्त सवाल

मुंबई : मनोहर भिडे (Manohar Bhide) पोलीस संरक्षणात एकापाठोपाठ वादग्रस्त विधाने करून महापुरूषांचा, साईबाबांचा व देशाचा अवमान करत आहेत, सामाजिक- धार्मिक भावना दुखावत आहेत, राज्यात आग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीही त्यांच्याविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई का होत नाही, अशी संतप्त विचारणा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली आहे.

विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मनोहर भिडे यांनी अमरावती, यवतमाळ, पिंपरी-चिंचवड अशा अनेक ठिकाणी आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. आज विरोधी पक्षांनी याबाबत विधानसभेत दाद मागण्याचा प्रयत्न केला. पण विरोधकांना बोलण्याची पुरेशी संधी दिली गेली नाही. पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पण त्यानंतर त्यांच्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई झाली नाही. ते अजूनही मोकाट फिरत आहेत आणि भाषणे देत आहेत. त्यांच्या माध्यमातून सामाजिक वाद निर्माण करायचे, दंगली घडवायच्या आणि त्याचा राजकीय फायदा मिळवायचा, हे राज्य सरकारचे धोरण आहे का, असाही प्रश्न अशोक चव्हाण यांनी केला.