शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी जिल्हा वार्षिक योजनेत 5 टक्के निधी राखीव

मुंबई –        शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या (Department of School Education and Sports) योजनांची पुनर्रचना करुन त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये (सर्वसाधारण) किमान 5 टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)  होते.   या बैठकीत शालेय शिक्षण व क्रीडा (क्रीडा उपविभाग वगळून ) विभागाच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधील सध्या अस्तित्वात असलेल्या शालेय शिक्षणाशी संबंधित चार योजनांची  पुनर्रचना करण्यास मान्यता देण्यात आली. त्या पुढीलप्रमाणे –

• जिल्हा परिषदांच्या क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळांची  इमारत व वर्ग खोल्यांची विशेष दुरुस्ती, स्वच्छतागृह दुरुस्ती

• जिल्हा परिषदांच्या क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळांची   इमारत व वर्गखोली बांधकाम, स्वच्छतागृह बांधकाम, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प व स्वच्छतागृह बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शालेय स्वच्छता, वाचनालय, शैक्षणिक बोलक्या भिंती  निर्माण करणे, जि.प.च्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र कक्षाचे बांधकाम, शाळेतील क्रीडांगण-पटांगण सुविधा निर्माण करणे,जिल्हा परिषदांच्या क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळांना संरक्षक भिंत उभारणे

• आदर्श शाळामध्ये विविध पायाभूत सुविधा निर्माण करणे

• विज्ञान प्रयोगशाळा  ( Science Lab ),संगणक प्रयोगशाळा (Computer Lab)/ डिजिटल शाळा,  इंटरनेट/ वाय-फाय सुविधा निर्माण करणे.
या योजनांसाठी मंजूर नियतव्ययाच्या किमान 5 टक्के इतका निधी शालेय शिक्षणाशी संबंधित (क्रीडा योजना वगळून) कायमस्वरुपी राखून ठेवण्यास मान्यता देण्यात आली. किमान 5 टक्के इतका निधी राखून ठेवण्याची मर्यादा ही मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी लागू राहणार नाही.  यावेळी भविष्यात राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अतिरिक्त निधी जिल्हा वार्षिक योजने (सर्वसाधारण) अंतर्गत उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.  ही सुधारित योजना 2022-23 या आर्थिक वर्षापासून लागू होईल.