‘राष्ट्रवादीची ताकद असूनही उमेदवार का निवडून येत नाही याचं आत्मपरीक्षण येथील कार्यकर्त्यांनी करावं’

नाशिक :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते खासदार शरद पवार हे या वयातही लोकविकासाची कामे अतिशय तत्परने कामे करतात. त्यामुळे आपला नेता ज्या ताकदीने काम करतो त्याच ताकदीने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील काम करून आपल्या पदाला न्याय द्यावा व स्थानिक स्वराज्य संस्था ते आमदार खासदार पदापर्यंत आपल्या हक्काचे उमेदवार निवडून द्यावे असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदवड – देवळा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक चांदवड येथील एनडीसीसी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, ग्रंथालय सेलचे अध्यक्ष विजय पवार, सेवादलाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अकबर शहा, देवळा तालुकाध्यक्ष यशवंत शिरसाठ, देवळा महिला तालुकाध्यक्ष उषाताई बच्छाव, महिला अध्यक्ष साधना भोकनळ, शहराध्यक्ष प्रकाश शेळके, देवळा शहराध्यक्ष दिलीप आहेर, युवक तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाकचौरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून अर्थचक्र थांबले आहे. विकास कामांना अडथळा येत असला तरी विकासाची कामे मार्गी लावण्यास महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. चांदवड तालुक्यात निवडून आलेल्या सदस्यांना पक्षाने नेहमीच झुकते माप देण्यात आले असून जास्तीत जास्त जनतेची कामे मार्गी लावावी असे आवाहन त्यांनी सदस्यांना केले. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी गावागावात घराघरात जाऊन जनजागृती करण्यात यावी. चांदवड तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद असतांना उमेदवार का निवडून येत नाही याचं आत्मपरीक्षण येथील कार्यकर्त्यांनी करावं. तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक जोमाने कामे करून हक्काची माणसं निवडून देऊन त्यांच्याकडून लोकविकासाची कामे हक्काने करून घ्या असे आदेश उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच यावेळी देवळा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन उमेदवार निवडुन आले त्याचे अभिनंदन केले.

यावेळी माजी आमदार उत्तमबाबा भालेराव म्हणाले की, येवला तालुका ज्याप्रमाणे अवर्षण प्रवण क्षेत्राप्रमाणे चांदवड तालुका देखील अवर्षण प्रवण क्षेत्र असून यासाठी महामंडळ तयार व्हावे अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मांजरपाडा प्रकल्पातील पाणी पुणेगावच्या माध्यमातून जलदगतीने जाण्यासाठी त्याची वहन क्षमता वाढविण्यासाठी पुणेगाव दरसवाडी कालव्याच्या दुरुस्तीची कामे मार्गी लावण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच तालुक्यातील पाण्याचा प्रश्न शासन स्तरावर मार्गी लावण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार म्हणाले की, प्रत्येक शनिवारी पदाधिकाऱ्यांनी आपल्या मूळगावी जाऊन नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घ्याव्यात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये एक नंबरचा पक्ष असेल असा निर्धार पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला असून त्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढविण्यासाठी सभासद नोंदणी अभियान यशस्वी पणे राबवून क्रियशील सदस्य वाढवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांनी महाविकास आघाडी सरकार असले तरी आगामी जिल्हा परिषद निवडणूका या स्वबळावर लढण्यात याव्या अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.