पत्रकारांना धमकी देणाऱ्या अजय मिश्रा यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी – नवाब मलिक

मुंबई दि. १५ डिसेंबर – पत्रकारांना धमकी देणाऱ्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

लखीमपूर घटना ही सुनियोजित कट होता असे एसआयटीने म्हटले असून या प्रकरणाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी शिविगाळ करत धमकी दिली शिवाय त्यांचे मोबाईलही जप्त केले हा मोठा गुन्हा आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

अजय मिश्रा टेनी हे राजीनामा देणार नाहीत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबाबदारी स्वीकारून त्यांचा राजीनामा घ्यावा. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धमकावणे त्यांना ताब्यात घेणे हा कुठला कायदा आहे अशी विचारणा करतानाच मोदीजी, तुमचा मंत्री अवाक्याबाहेर जात आहे त्याच्याकडील तात्काळ मंत्रीपद काढून घ्यावे अशी जोरदार मागणीही नवाब मलिक यांनी यावेळी केली.