”आम्हाला वाटलं श्रेय घ्यायची गरज आहे तर घेऊ”, कांद्यावरुन अजित पवार थेटच बोलले

Onion News : केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा (onion) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिली. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल असेही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमितशाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी फडणवीस यांनी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा केंद्रच्या निर्णयाबद्दल माहिती दिली. त्यामुळे कांद्यावरुन श्रेयवाद सुरुय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. पत्रकार परिषदेमध्ये श्रेयवादाचा प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे आणि आम्ही दोघेही सरकारचाच भाग आहोत. त्यामुळे त्यात अडचण काय?

कांद्याबाबत श्रेयवादाची लढाई अजिबात सुरु नाही. टीका करणारे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेत नाहीत. आम्ही श्रेयासाठी हापालेले नाहीत. तरीही आम्हांला वाटलं श्रेय घ्यायची गरज आहे तर घेऊ, अडचण काय आहे?, असे अजित पवार पुढे म्हणाले.