पंकजा मुंडे यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न मागील काही वर्षात सुरू आहे – जयंत पाटील

मुंबई – २०१४ साली अशोक चव्हाण यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन शिवसेना – कॉंग्रेस आघाडीबाबत चर्चा केली असा अशोक चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला असेल तर त्यात तथ्य असणे स्वाभाविक आहे असे मत व्यक्त करतानाच सध्या मुख्यमंत्र्यांनी जी युती केली आहे ती कशासाठी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला.

पंकजा मुंडे यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न मागील काही वर्षात सुरू आहे…

पंकजा  मुंडे यांना भाजप म्हणावे तितके महत्त्व देत नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यांना थोडंसं बाजूला काढण्यात आले आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजप वाढवण्यासाठी मोठे कष्ट घेतले. मुंडे साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, पंकजाताई मुंडे यांनाही तो वर्ग पाठिंबा देतो. त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी करण्याचे काम मागील काही वर्षात सुरू आहे म्हणून त्यांनी आपले मत खंत म्हणून व्यक्त केले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

मराठा समाजाबद्दलचे तानाजी सावंतांचे वक्तव्य तीच भूमिका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची…

मराठा तरुणांबद्दल आणि समाजाबद्दल मंत्री तानाजी सावंत यांनी वक्तव्य केले ते अत्यंत धक्कादायक आहे. तीच भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आहे फक्त ते मांडत नाहीत तानाजी सावंत ते मांडत आहेत असा टोला जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.

आता मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना कमी बोलण्यास सांगितले असले तरी माणसाचा स्वभाव जात नाही इथे तर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र झाले आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी सांगितले तरी माईक समोर आल्यावर मनातल्या सगळ्या गोष्टी व्यक्त करण्याची प्रथा आणि इच्छा बर्‍याच जणांची जागृत होताना दिसते असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी तानाजी सावंत यांना लगावला.