दिवसातून एकदाच आंघोळ करा, तीही कमी पाण्याने; बीसीसीआयच्या खेळाडूंना सूचना 

हरारे –  भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे, जिथे दोन संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथे होणार आहेत. यासाठी भारतीय संघ हरारे येथे पोहोचला आहे, मात्र येथे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

समस्या आंघोळीच्या पाण्याची आहे. हरारेसह झिम्बाब्वेतील बहुतांश शहरांमध्ये सध्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) भारतीय खेळाडूंना पाण्याच्या कमतरतेबाबत सूचना दिल्या आहेत.

बीसीसीआयने खेळाडूंना जास्त पाणी न  वापरण्यास सांगितले आहे. शक्य असल्यास दिवसातून एकदाच आंघोळ करा, तीही कमी पाण्याने. बीसीसीआयने खेळाडूंना पाण्याचा अपव्यय न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय अनेक निर्बंधही लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडूंना जवळपास 30 अंश उष्णतेमध्ये पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

झिम्बाब्वेच्या महिला राजकारणी लिंडा त्सुंगिराय मसारिरा यांनीही ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी लिहिले, ‘विशेषत: पश्चिम हरारेसह उर्वरित राजधानीत जवळपास तीन आठवड्यांपासून पाणीपुरवठा नाही. पाणी हे जीवन आहे, त्याच्या अनुपस्थितीमुळे लोकांचे आरोग्य आणि स्वच्छतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य मंत्रालय आणि हरारे प्रशासनाने लोकांच्या जीवाशी खेळणे थांबवावे. तसेच लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करावी.अशी मागणी देखील केली आहे.