देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री करून भाजपने त्यांचे पंख छाटले ?

मुंबई – महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री म्हणून बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा काल शपथविधी झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी त्यांना राजभवनामध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

दरम्यान,  एकनाथ शिंदे  हे मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) शपथ घेणार, हाच मुळात आज पहिला धक्का राज्यासाठी अन् देशासाठी होता. पण थोड्यात वेळात शिंदेंना मुख्यमंत्री बनवून सरकारच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आले असलेल्या फडणवीसांनी (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, हा सर्वात मोठा धक्का होता.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (BJP president JP Nadda) यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून त्यांचा त्याग आणि निष्ठा दिसून येते असं अमित शाह (Amit Shah) म्हणाले. दरम्यान, बीबीसी मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत जेष्ठ पत्रकार श्रीमंत माने म्हणाले,  फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा त्याग केल्याचं जाहीर केल्यावर त्यांची प्रतिमा उचांवणारी होती. ते कदाचित केंद्रीय नेतृत्वाला आवडलं नसेल. हे एक प्रकारे फडणवीसांचं खच्चीकरण आहे. एवढ्या मोठ्या क्षमतेच्या माणसाला मुख्यमंत्रिपद नाही आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करायला लावणं म्हणजे त्यांच्या क्षमतांचं अवमूल्यन आहे.असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बंडखोर शिंदेंना मुख्यमंत्री बनवून २०१९ मध्ये आपण उद्धव ठाकरेंनाही (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री बनवू शकलो असतो, असाच संदेश देत ठाकरेंना डिवचले असल्याचे बोलले जात आहे. तर फडणवीस यांचा दिल्लीतील वरिष्ठांनी पंख छाटले असं देखील काहीजण सांगत आहेत. एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे,असं ट्वीट करून फडणवीस यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.