तीन पक्ष एकत्र लढले तरच भाजपचा पराभव शक्य

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव (Jayashree jadhav) यांनी भाजपचे सत्यजित कदम (Satyjeet kadam)  यांचा 18,901 मतांनी पराभव केला आहे.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे.
पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं. एकूण 26 फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला.

दरम्यान,  शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष एकत्र लढल्यास भाजपचा निभाव लागणे कठीण जाते, हे पुणे, नागपूर पदवीधर मतदारसंघापासून ते कोल्हापूरच्या निकालावरून स्पष्ट झाले आह़े  तीन पक्ष एकत्र लढल्याने मतांचे विभाजन होत नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रित लढविल्यास त्याचा भाजपवर निश्चितच परिणाम होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.