विरोधकांना धूळ चारत ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच नंबर वन

नागपूर – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये २४८२ ग्रामपंचायती जिंकून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी (BJP) नंबर वन ठरली आहे. या यशाबद्दल आपण कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मंगळवारी सांगितले.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी युतीला कौल दिला आहे. उपलब्ध आकडेवारी ध्यानात घेता भाजपाचा दणदणीत विजय झाल्याचे दिसते. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला ८४२ ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे. आमच्या विरोधी पक्षांच्या एकत्रित संख्येपेक्षा अधिक सरपंच भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना युतीचे निवडून आले आहेत. सत्तांतरानंतर यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदारांनी युतीला पसंती दिली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात असताना आता महाराष्ट्रातही त्यांच्या विचारांच्या सरकारचे काम राज्यातील जनतेला पसंत पडले आहे. आपण या विजयाबद्दल मा. एकनाथ शिंदे आणि मा. देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन करतो, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राज्यातील ग्रामीण जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत पुनःपुन्हा शिंदे फडणवीस सरकारला पसंती दिली आहे. याच पद्धतीने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही युती विजयी होईल. तसेच महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत शहरी मतदारही भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना युतीला कौल देईल याची खात्री आहे.