मुलांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त करू नये, सरकार चर्चेसाठी तयार – वर्षा गायकवाड

मुंबई : परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर, धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचं समोर आलं आहे.

आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर हजारो विद्यार्थी जमा झाले आणि त्यांनी वर्षा गायकवाड यांच्या घराला घेराव घालत सरकारविरोधात जोरदार घोषबाजी सुरू केली. काही दिवसांपूर्वीच परीक्षा ऑफलाईनच होणार असे शिक्षणमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर आज विद्यार्थी त्याविरोधात आक्रमक झाले आहेत.

कोरोनाकाळात परीक्षा ऑफलाईन घेण्याला विद्यार्थ्यांचा जोरदार विरोध पहायला मिळात आहे, त्यामुळे सरकार आता निर्णय बदलून परीक्षा ऑनलाईन घेत विद्यार्थ्यांची मागणी मान्य करणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.या संपूर्ण प्रकरणावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शाळेतील मुलं दोन आघाड्यावर लढत आहेत, एकीकडे कोरोनाची परिस्थिती तर दुसरीकडे दोन वर्षांपासून शिक्षणामध्ये निर्माण झालेली पोकळी. असं असताना आता मुलांना भडकावून त्यांना रस्त्यावर आणू नये, काही सूचना करायची असेल तर ती राज्य सरकारशी करावी असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. या आंदोलनामागे ज्या कोणत्या संघटना आहेत किंवा जे कोणी व्यक्ती आहे त्यांनी त्यांच्या काही सूचना असतील तर सरकारला कराव्यात, सरकार चर्चेसाठी तयार असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, दहावी-बारावीच्या परीक्षा या ऑनलाईन घ्या या मागणीसाठई मुंबई, नागपूर, उस्मानाबाद यासह अनेक ठिकाणी आज विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. त्यावर बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुलांची सुरक्षा आणि आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या मुलांच्या परीक्षेसंबंधी काही सूचना असतील तर त्या शिक्षण विभागाला कराव्यात. सरकार या संबंधी चर्चेसाठी तयार आहे. परंतु अशा पद्धतीने मुलांना कोणी रस्त्यावर उतरवू नये.