विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचं पाप केलं जात आहे, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे – दरेकर

मुंबई : परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर, धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचं समोर आलं आहे.

आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर हजारो विद्यार्थी जमा झाले आणि त्यांनी वर्षा गायकवाड यांच्या घराला घेराव घालत सरकारविरोधात जोरदार घोषबाजी सुरू केली. काही दिवसांपूर्वीच परीक्षा ऑफलाईनच होणार असे शिक्षणमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर आज विद्यार्थी त्याविरोधात आक्रमक झाले आहेत.

कोरोनाकाळात परीक्षा ऑफलाईन घेण्याला विद्यार्थ्यांचा जोरदार विरोध पहायला मिळात आहे, त्यामुळे सरकार आता निर्णय बदलून परीक्षा ऑनलाईन घेत विद्यार्थ्यांची मागणी मान्य करणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, आता या सर्व घडामोडींवर राजकीय प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. या आंदोलनावरून भाजपने सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे, या राज्यात लोकशाही राहिलेली नाही, मनाला येईल तेव्हा लाठीमार, मनाला येईल तेव्हा जेलमध्ये टाकायचं, मनाला येईल तेव्हा गुन्हे दाखल करायचे, असा धंदा सरकारकडून सुरू असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचं पाप हे सरकार करतंय अशी टीका दरेकरांनी केली आहे. यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, असेही दरेकर म्हणाले आहे. परीक्षांच्या संदर्भात ज्या संस्थाची निवड केली त्या संस्थाचे काम बघा असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनीही महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. अशा सरकारकडून काय अपेक्षा करायच्या अशी कोपरखिळी सुधीर मुनगंटीवर यांनी मांडली आहे. महाराष्ट्र हे कुणाच्या नावावर असणारे राज्य नाही, खोट्या बहुमताच्या आधारे हे सरकार आलं आहे, आता तरी सरकारने डोकं ठिकाणावर आणावे, अशी टीका भाजपने केली आहे.