तुम्ही मुंब्र्याचा छोटा पाकिस्तान तयार करण्याचं पाप केलंय; ‘केरला स्टोरी’वरुन जितेंद्र आव्हाड-चित्रा वाघ आमने सामने
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द केरला स्टोरी (The Kerala Story) चित्रपटाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. त्या चित्रपटामध्ये जी 32 हजार महिलांची कथा सांगितली गेली, त्याबद्दल स्वतः चित्रपटाचा प्रोड्यूसर म्हणतो की ही कथा फक्त 3 महिलांची आहे. असत्याच्या आधारावर हिंसा, द्वेष निर्माण करायचा आणि त्याच माध्यमातून पुढे निवडणूका जिंकायच्या हे गणित लावूनच असे चित्रपट काढले जातात. या चित्रपटाचा निर्माता कुणीही असो, त्याला सार्वजनिकपणे फाशी दिली गेली पाहिजे, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.
आता जितेंद्र आव्हाडांच्या या भूमिकेवरुन भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्र वाघ (Chitra Wagh) यांनी त्यांना सुनावले आहे. ‘द केरल स्टोरी’ चित्रपटातून मांडलेला धर्मांतरासारखा मुद्दा सत्य घटनेकडे डोळेझाक करणा-या जितेंद्र आव्हाडांना गंभीर वाटत नसेल तर त्यांनाच लाज वाटायला पाहीजे. जितेंद्र आव्हाड यांच्या आत्ता पर्यंतच्या भूमिका यात खतपाणी घालणा-याच आहेत. मुळात त्यांना एवढा पुळका येण्याचं कारण समजू शकते. त्यांची रोजी रोटी याच वोट बॅंकेवरच चालते. पण वोट बॅंकच्या नादात तुम्ही मुंब्र्याचा छोटा पाकिस्तान तयार करण्याचं पाप केलंय हे पण विसरू नका, असा घणाघात चित्रा किशोर वाघ यांनी केला आहे.