मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त; राज्याला अपंग करुन सोडलंय – जयंत पाटील

मुंबई – गुवाहाटीतील वस्तीचे दिवस आणि आतापर्यंतचे दिवस पाहिले तर दोन महिने झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत आणि दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात जयंत पाटील आले असता माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार का करत नाही… ज्याअर्थी करत नाही त्याअर्थी त्यांच्यात मतभेद आहेत. जे लोकं जीवाभावाची शिवसेना (Shiv Sena) सोडून गेले आहेत त्यामुळे तिथे फलप्राप्ती झाल्याशिवाय ते गप्प बसतील असं वाटत नाही त्यामुळे मतभेदाची जास्त शक्यता आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

या राज्यातील गोरगरीबांचे प्रश्न आज सुटण्याऐवजी वाढायला लागले आहेत. राज्यात पुरपरिस्थिती मोठी आहे. पुरामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे त्या भागात पालकमंत्री नाहीय फक्त दोन मंत्री महाराष्ट्राला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या रुपाने आहेत. परंतु त्यांच्यातील गुंता सोडवण्यातच त्यांचा जास्त काळ जात आहे अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

राज्यात पुरपरिस्थिती (Precondition) असल्याने जनता हवालदिल झाली आहे. हे लोक पावसाळा संपेपर्यंत थांबले असते तर आमचे आघाडीतील मंत्री तिथे ठाण मांडून बसले असते आणि फार मोठी मदत लोकांना झाली असती. महाराष्ट्रात मंत्री नसल्याने जिल्हया- जिल्हयात दयनीय अवस्था झाली आहे आणि हीच अवस्था लोकांना चिंता करायला लावणारी आहे असेही जयंत पाटील म्हणाले.