जीव गेला तरी बेहत्तर, दडपशाही सहन करणार नाही – ॲड. ठाकूर

अमरावती : “ केंद्रातील मोदी सरकारची दडपशाही सहन करणार नाही, प्रसंगी आमचा जीव गेला तरी बेहत्तर! सोनियाजींना कुणी हात लावला, तर आम्ही त्यांना माफ करणार नाही” असे ठणकावून सांगत काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Adv. Yashomati Thakur) यांनी मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात जोरदार घोषणा दिल्या. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress president Sonia Gandhi) यांना ईडीने (ED) चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस दिल्यानंतर आज देशभरात काँग्रेस (Congress) आक्रमक झाली असून सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ देशभरात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. अमरावतीतही काँग्रेस नेत्या तथा माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हा काँग्रेसच्यावतीने अमरावती विभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढून इर्विन चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी ॲड. ठाकूर यांनी माध्यमाशी संवाद साधला.

केंद्रातील मोदी सरकार (Modi Govt) ने जे काही चालवलं आहे, कित्येक राज्यांमध्ये EDच्या भरोशावर ऑपरेशन लोटस सुरू केलेलं आहे. आज आमच्या नेत्या सोनियाजी यांची प्रकृती ठीक नसताना, त्या रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना या निर्दयी माणसाने चौकशीला बोलावलं आहे, असा आसूड ॲड. ठाकूर यांनी मोदी विरोधात लगावला. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची ईडीमार्फत केली जाणारी चौकशी ही राजकीय द्वेषातून केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या मोदी सरकारच्या कळसूत्री बाहुल्या झाल्या असून सरकारच्या इशाऱ्यावर त्या केवळ सरकार विरोधात आवाज उठविणाऱ्या, तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करत आहेत. पण ही दडपशाही आम्ही सहन करणार नाही, असे आक्रमतेने सांगत त्यांनी इर्विन चौकात जोरदार घोषणा दिल्या. तसेच ‘खूप झाली दडपशाही, देशात हवी लोकशाही’, ‘बंद करा बंद करा, तपास यंत्रणांचा गैरवापर बंद करा’ अशा आशयाचे फलक घेऊन हे आंदोलन करण्यात आले.

अमरावती जिल्हा काँग्रेस ग्रामीण व शहरच्यावतीने आज अमरावती येथील इर्विन चौकात हे निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान अमरावती विभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकारी पवनीत कौर (Collector Pavneet Kaur) यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशमुख, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, आमदार अमित झनक, आमदार बळवंत वानखेडे, आमदार वजाहत मिर्झा, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)चे अध्यक्ष बबलु देशमुख, शहर अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, किशोर बोरकर आदी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठयासंख्येने उपस्थित होते.