भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने स्वर्गीय सुरांचे स्वर्णिम पर्व संपले – नाना पटोले

मुंबई – आपल्या स्वर्गीय स्वरांनी भारतीय संगीत क्षेत्राला समृद्ध करणा-या गानकोकीळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त सुन्न करणारे आहे. आपल्या सुमधूर आवाजाने त्यांनी संपूर्ण जगातील रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक स्वर्णिम पर्व संपले आहे अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

लता मंगेशकर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून नाना पटोले म्हणाले की, लता दीदींच्या आवाजात जादू होती, असा आवाज शतकात एखाद्यालाच लाभतो. वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी पहिले गाणे गायले होते. आपल्या ७८ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत लतादीदींनी हिंदी, मराठीसह २० भाषांमधील २५ हजारांहून अधिक गितांना आवाज दिला.

आनंदघन नावाने त्यांनी अनेक चित्रपटांना संगीतही दिले होते. संगीतक्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना महाराष्ट्र भूषण, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न पुरस्कारासह जगभरातील अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. लतादीदी ह्या फक्त महाराष्ट्राचेच नाही तर देशाच्या भूषण होत्या. त्यांच्या निधनाने संगीत आणि सांस्कृतीक क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी आपल्या गाण्यांच्या माध्यमातून त्या चिरकाल स्मरणात राहतील. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.