‘तीन तिघाडी अन् काम बिघाडी, ही म्हण महाभकास आघाडीला तंतोतंत लागू होते’

मुंबई – राज्यातील भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केल्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या सर्व आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आमदारांना अधिवेशनाबाहेर निलंबित करण्याचा ठराव ‘असंवैधानिक’, ‘बेकायदेशीर’ आणि ‘विधानसभेच्या अधिकारांच्या पलीकडे’ आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

एका अधिवेशनापेक्षा जास्त काळा निलंबन सभागृहाच्या अधिकारक्षेत्रात नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे असा निर्णय घेणं असंविधानिक असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाला हा धक्का मानला जात आहे. येत्या मार्च महिन्यात राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून या निर्णयामुळे भाजपच्या १२ आमदारांचा पुन्हा विधानभवनात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्वोच्च न्यायायलायच्या या निर्णयानंतर जिंतूर-सेलू मतदारसंघाच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नही..! तीन तिघाडी अन् काम बिघाडी, अशी म्हण आहे ती महाभकास आघाडीला तंतोतंत लागू होते. भाजपाच्या आमदारांचे निलंबन रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने मविआ सरकारला जोरदार झटका दिला आहे. शेवटी विजय सत्याचाच होतो, हेही या निकालाने दाखवून दिले आहे.’ असा घणाघात मेघना बोर्डीकर यांनी केला आहे.