‘फक्त 24 तास गृहमंत्र्यांनी पोलिसांना सुट्टी द्यावी,मग…’; सोमय्यांवरील भ्याड हल्ल्यानंतर नितेश राणे आक्रमक

मुंबई – राज्यात कायदा सुव्यवस्था (Law and order) आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण विरोधी पक्षातील नेत्यांवर सत्ताधारी मंडळींकडून हल्ले करण्यात येत असल्याचे वारंवार समोर येत आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) यांना पोलिसांनी काल अटक केली आहे. दरम्यान, त्यांना भेटायला आलेले भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. खार पोलीस ठाण्यातून (Khar Police Station) बाहेर पडताच हा हल्ला झाला आहे. ( Shiv Sena Attack Somaiya Car ) दरम्यान या प्रकरणी सोमय्या यांनी बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

खार पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या राणा दांपत्याला भाजपा नेते किरीट सोमय्या भेटायला आले असता शिवसैनिकांनी पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. सोमय्या हे पोलीस ठाण्याबाहेर पडताच शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. गाडीवर चपलांचा मारा केला. तसेच, दगडही गाडीवर मारण्यात आले. त्यात सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली असून सोमय्या यात जखमी झाले आहेत.

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. तुम्ही हल्ले करताना आम्ही शांत बसणार नाही असेही राणे म्हणाले. आता तांडव होणार, किती गुन्हे दाखल करायचे ते करा असा इशाराही राणे यांनी दिला. फक्त 24 तास गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी (Home Minister Dilip Walse Patil) पोलिसांना सुट्टी द्यावी. मग या हल्ले करणाऱ्यांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा देखील राणेंनी दिला.

आम्ही विचारांची लढाई विचाराने करु, दगडाची भाषा दगडाने करु असेही राणे यावेळी म्हणाले. आता तांडव होणार, किती गुन्हे दाखल करायचे ते करा असे राणे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप राणेंनी केला. तुम्हाला आमच्या जीवापर्यंत यायचे असेल तर आम्हालाही जीवाचे संरक्षण करायचे आहे. ही राजकीय लढाई नाही, कारण राजकीय लढाई ही व्यासपीठावर लढली जाते. हे सध्या अघोषीत गँगवार सुरु असल्याचे राणे म्हणाले.