‘मी कोणत्याही प्रकल्पाला नकार दिलेला नाही, भागवत कराड खोटं बोलणं बंद करा…’

मुंबई  – मराठवाड्यातील कोणत्याही प्रकल्पाला मी नकार दिलेला नाही. केंद्रीय मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी खोटे बोलणे बंद करावे. औरंगाबादकरांना इम्प्रेस करण्यासाठी भागवत कराडांचा उद्योग सुरू असल्याचे जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना दिले.

मराठवाड्यातील प्रकल्प मंजूर करण्यास जयंत पाटील यांनी नकार दिला, असे वक्तव्य भागवत कराड यांनी केले होते. त्यावर जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल करत त्यांच्या आरोपाची पोलखोल केली. फ्लोटींग सॉलर पॅनल प्रॉजेक्टबाबत भागवत कराड यांनी फक्त पत्र लिहिले होते. त्यामुळे सरकार फक्त पत्रावर चालत नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

खरंतर केंद्राच्या एनटीपीसीकडून प्रस्ताव यायला हवा होता मात्र भागवत कराड यांनी राज्यसरकारकडे पत्र दिले. तरी केंद्रीय मंत्री असल्याने आम्ही त्यांच्या पत्राची दखल घेतली व एक समिती गठीत केली. एप्रिलच्या शेवटी पत्र आले आणि जूनच्या सुरुवातीला आम्ही याबाबत समिती गठीत केली. त्यामुळे प्रकल्प घालवला हे सांगणे चुकीचे आहे मी नकार दिला आहे असे म्हणत असतील तर एकतरी कागद दाखवा असेही जयंत पाटील यांनी जाहीर आव्हान दिले.

भागवत कराड यांना राज्यसभा नाही तर औरंगाबादमध्ये लोकसभेला भाजपने उभे राहायला सांगितले आहे त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. निवडणूक लढवायची असेल तर लढवावी पण खोटं बोलू नये. माझ्यादृष्टीने त्यांना मी जास्त महत्त्व देत नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

आम्ही नाचत नाही आम्ही जे काही करायचं असते ते ‘करेक्ट’ करतो. त्यांना आता काही जमत नसेल म्हणून लोकांना प्रभावित करण्यासाठी ते अशी विधाने करत असतील तर त्यांनी जयंत पाटील यांनी नकार कधी दिला, निगेटिव्ह पत्र आमच्याकडून कधी गेले, त्यांना कुणी नाही म्हटलं याबाबत माहिती द्यावी. प्रकल्प कुणीच थांबवला नाही. त्यांनी फार मोठा तीर मारला असेही नाहीय. त्यांनी प्रकल्प आणला नाहीय. त्यांनी कल्पना रंगवली पाण्यावर सोलर पॅनल बसवू यावर खात्यात याअगोदरच चर्चा सुरू होती त्यामुळे नवीन रॉकेट सायन्स नाहीय असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.