कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी ‘या’ गैरव्यवहाराची माहिती मागवल्याने झाली बदली ?

पुणे : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची आयुक्त, कुटुंबकल्याण संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावरून पुन्हा बदली करण्यात आली आहे. दोन महिन्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती. स्पटेंबर 2022 मध्ये तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात होती. या दोन महिन्यात आरोग्य विभागात शिस्त आणण्याचा मुंढेंचा प्रयत्न होता. मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. दोन महिन्याच्या आतच मुंडे यांचा कार्यभार काढला गेला आहे. 16 वर्षात 19 वेळा तुकाराम मुंडे यांची बदली केली गेली आहे.

आरोग्य विभागात क्रांतिकारी बदल करण्याच्या मनसुब्याने काम सुरु करणाऱ्या मुंढे यांचा नक्की कोणाला अडसर ठरत होता असा प्रश्न आता उपस्थित होत असून तुकाराम मुंढेच्या बदलीवर सन्नाटा का..? असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांच याचा जाब विचारण्याची मोहीम सुरु झाली आहे. सामाजिक कर्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी ही मोहीम सुरु केली असून याला आता राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे.

मध्यंतरी मी बालविवाहाच्या अभ्यासासाठी फिरताना मेळघाटमध्ये एका दुर्गम आरोग्य केंद्रात गेलो होतो. दिवस रविवार असल्याने सोबतच्या कार्यकर्त्याना डॉक्टर नर्स भेटतील का ? विचारलं. तेव्हा ते म्हणाले रविवार काय सध्या रात्रीही डॉक्टर भेटतात… आणि त्यांनी तुकाराम मुंढे इफेक्ट सांगितला. तुकाराम मुंढे आरोग्य विभागात आल्यामुळे  आरोग्यव्यवस्था कशी सुधारते आहे.मेळघाटातील सगळ्या दवाखान्यात डॉक्टर पूर्णवेळ थांबत आहेत हे सांगितले… मी अतिशय भारावून गेलो. आरोग्यव्यवस्था सुधारण्याची आशा जागली.. पण दुर्दैवाने हा आनंद फारकाळ टिकला नाही. पुन्हा त्यांची बदली झाली व आरोग्यव्यवस्था पुन्हा रुग्ण झाली. अशी खंत कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना काळानंतर सारे राजकीय नेते सामाजिक संस्था आणि आपण सारे आरोग्यव्यवस्था सक्षम झाली पाहिजे म्हणून गळे काढत होतो ना ? खाजगी व्यवस्था लुटारू आहे म्हणून आपण सरकारी व्यवस्था सक्षम झाली पाहिजे हेच आपण बोलत होतो ना ? मग एक प्रामाणिक अधिकारी याविषयी पुढाकार घेताना आपण सारे त्याच्या पाठीशी का उभे राहिलो नाही…? असा सवाल हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.

राजकीय लोक पक्ष हे गप्प आहेत. ते तसेच वागणार कारण भ्रष्ट व्यवस्था हाच त्यांचा यशाचा पाया आहे. मला असे वाटते की सामाजिक संस्था व आपण सामान्य माणसे यांनी आक्रमक होऊन किमान हे आम्हाला आवडले नाही हे स्पष्टपणे मुख्यमंत्री यांना सांगण्याची आवश्यकता आहे. जर काही लाख इ-मेल मुख्यमंत्री यांच्या इमेल वर गेले तर नक्कीच त्यानाही जाणीव होईल. असे आवाहन हेरंब कुलकर्णी यांनी केले आहे.

राजकारणी वाईट आहेतच पण आपण केवळ हळहळ व्यक्त करतो, छोटी कृतीही करत नाही हे जास्त दुःखदायक आहे. सर्वांसमोर गरिबांसाठी आरोग्यव्यवस्था सुधारायला निघालेल्या एका प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली होते आणि यावर  साधी रेषाही उमटत नाही हा काय प्रकार आहे ? लोक काहीही बोलणार नाही हा आत्मविश्वास असल्यानेच हा  उद्दामपणा वाढला आहे. अशी नाराजी हेरंब कुलकर्णी यांनी बोलून दाखवली आहे.

तुकाराम मुंढेंनी करोना काळातील गैरव्यवहाराची माहिती मागवल्याची चर्चा आहे. सरकारी डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिसवर मर्यादा आणून जास्तीत जास्त सरकारी सेवेची सक्ती त्यांनी केली. रेफरल म्हणजेच सरकारी रुग्णालयातल्या पेशंटला खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यावर बंदी आणण्यात आली आणि यामुळे खाजगी दवाखान्यांचे धाबे दणाणले. खाजगी दवाखान्यातल्या औषधांऐवजी सरकारी रुग्णालयातलीच औषधं देण्याला प्राधान्य देण्याचे आदेश दिले. कोणत्या सरकारी डॉक्टरांचे नातेवाईक खाजगी दवाखाने चालवतात याचीही फाईल मागवली यामुळे त्यांची बदली झाली. म्हणून मला असे वाटते की प्रत्येकाने केवळ हळहळ व्यक्त न करता मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना इमेल करावा. असे आवाहन हेरंब कुलकर्णी यांनी केले आहे.

तुकाराम मुंढे यांची अन्यायकारक बदली रद्द करा व आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी पुन्हा आरोग्य व्यवस्थेत नियुक्ती करा अशी मागणी करावी. जर किमान १ लाख मेल व मेसेज गेले तर नक्कीच दबाव निर्माण होईल. दुर्जनांच्या सक्रियतेपेक्षा सज्जनांची निष्क्रियता जास्त घातक असते असे कुलकर्णी म्हणालेत.