‘शिवसेनेत हिंमत असेल तर चौकशी करावी, नाही तर प्रकाश आंबेडकर यांची जाहीर माफी मागावी’

मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना मागील निवडणुकीत १ हजार कोटी रुपये मिळाल्याचा बालिश अन हास्यास्पद आरोप शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केलाय. वेगवेगळ्या गुन्ह्याच्या तपासाच्या तोंडी गेलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना मग ते आदित्य ठाकरे असो इनकम टॅक्स व ईडीच्या रडारवर असलेले संजय राऊत, प्रताप सरनाईक असो. महाविकास आघाडीचे प्रस्थपित, कॅबिनेट मंत्री जेलमध्ये सडत आहेत. भ्रष्टाचारात माखलेले गुन्हेगारांचे सरकार झाल्याची चर्चा आहे. असं वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी म्हटले आहे.

या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी बालबुद्धीचा आमदार संतोष बांगर याला पुढे करून शिवसेनेने आदरणीय आणि कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या बाळासाहेबांवर बिनबुडाचे आरोप केले आहेत व वंचित बहुजन आघाडीची जाहीर बदनामी केली आहे. याचा आम्ही कडाडून निषेध करतो.

बालीश आमदार बांगरकडे जर पुरावे असतील तर त्यांच्याचकडे सत्ताही आहे. शिवसेनेला जाहीर आव्हान आहे की सत्तेत असलेल्या शिवसेनेने ईडी, सीबीआय, सीआयडी जी यंत्रणा लावायची ती लावून आरोप सिद्ध करावे. नाही तर सत्ताधारी शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीची यांची जाहीर माफी मागावी, असे आव्हान ठाकूर यांनी शिवसेनेला दिले.