बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा उद्धव ठाकरेंना संशय आहे की काय? रामदास कदमांची जहरी टीका

रत्नागिरी : शिंदे गटातले (Ekanth Shinde Gorup) नेते आणि शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी ठाकरे परिवारावर जहरी टीका केलीय. उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार आहेत असं बोलताना रामदास कदमांनी (Ramdas Kadam) उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केलाय.

tv9 ने दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे हे आपण बाळासाहेबांचा मुलगा आहे असं वारंवार सांगतात. त्यामुळं बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) संशय आहे की काय? असं म्हणत कदमांनी जहरी टीका केली. सोनिया गांधींच्या नादाला लागून उद्धव ठाकरे बिघडले असंही रामदास कदम म्हणालेत. शिंदे गटाने आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी दापोलीत मेळावा घेतला होता. या मेळाव्यात रामदास कदम बोलत होते.

ते म्हणाले,  उद्धवजी तुम्ही शिवसेना मोठी केली नाही. मातोश्रीवर देखील खोके गेलेत, तोंड उघडायला लावाल तर भुकंप होईल. यांनी एवढे खोके खाल्ले, यांना डायबेटीस कसा होत नाही? दोन वर्ष माझ्या शासकीय बैठकांत अधिकार नसताना देखील ढवळाढवळ करत असत. बाप मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री. एखाद्याला संपवून टाकायचं, गद्दारी याला म्हणतात. मला आश्चर्य वाटतं की, उद्धव ठाकरे जातील तिथे रश्मी ठाकरे असतात. मासाहेब कधीच व्यासपीठावर चढल्या नाहीत.असं देखील ते म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर रामदास कदम यांना कसं संपवायचा याचा कार्यक्रम सुरु होता. पर्यावरण खाते मला संपवण्यासाठी मला दिलं, त्यांना वाटलं मला काही कळणार नाही. प्लॅस्टिक बंदीचा कायदा केला त्यावेळी आदित्य आपण केला आपण केला असं सांगत होते. असं कदम म्हणाले.