देहूतील कार्यक्रमात अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान – सुप्रिया सुळे

Pune – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.

या कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण झाले. मात्र अजित पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. अजित पवारांचे भाषण न झाल्याने पंतप्रधान मोदीही आश्चर्यचकित झाले. त्यांनी हाताने इशारा करुन याबाबत सूचना केली होती.पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर नरेंद्र मोदींचे भाषण झालं.

दरम्यान, या घडामोडींवर आता उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान (Insult) असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवारांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. पण त्यांना बोलू दिलं नाही.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असल्याने त्यांना बोलू द्यावं अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली होती. पण पीएमओने (PMO) त्याला काही उत्तर दिलं नाही. हे अतिशय वेदनादायी आणि अपमानकारक आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) आहेत. त्यांना न बोलू देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे जे झालं ते अयोग्य आहे.