‘असं क्वचितच होत असेल की एखादा माणूस जो अचानक आला तो पद सोडताना लोकांच्या डोळ्यात अश्रु येतात’

मुंबई – महाराष्ट्रात इतक्या दिवसांच्या राजकीय उलथापालथीनंतर अखेर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करण्यात आले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुरुवातीला या सरकारमध्ये फडणवीस सहभागी न झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते मात्र वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे.

दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शिवसेना भवनात (ShivSena Bhavan) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी भाजपला (BJP) लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, ज्यांनी हे सरकार स्थापन केले त्यांच्या मते त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. हेच तर मी सांगत होतो, जर हे पूर्वीच केलं असत तर आता अडीच वर्षे पूर्ण झाली असती, आणि जे झाले ते सन्मानाने झालं असतं. तेव्हा नकार दिला, आता अस का केलं? शिवसेनेला बाजुला ठेवुन शिवसैनिकाला मुख्यमंत्री अस होऊ शकत नाही.

ते म्हणाले, माझ्यावरील राग माझ्या मुंबईवर काढु नका…. मुंबईच्या काळजात कट्यार घुसली अस करु नका. हात जोडुन विनंती, माझ्यावरचा राग मुंबईवर काढु नका. आरेचा आग्रह रेटु नका, पर्यावरणाला हानी पोहचवु नका. तिकडे वन्य जीवन आहे. आरेचा निर्णय बदलल्यामुळे दु:ख झाले.आता सरकार वरती – खालती तुमचंच आहे. कांजुरचा प्रस्ताव दिला होता, ही जमीन मुंबईकरांची असून मुंबईच्या पर्यावरणाशी खेळु नका.

लोकशाही वाचवा, चारही स्तंभ एकत्र या. पूढे या. लोकशाहीचे धिंडवडे थांबवण्याची गरज आहे, ज्याने मत दिले त्याचा बाजार असा मांडला गेला तर ते चुकीचे आहे. मतदाराचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल. अमित शाहांनी (Amit Shah) शब्द पाळला असता, तर सरकार शानदार असतं.मी महाराष्ट्रातील तमाम जनतेचा ऋणी आहे, अस क्वचितच होत असेल की एखादा माणूस जो अचानक आला तो पद सोडताना लोकांच्या डोळ्यात अश्रु येतात.असं ते म्हणाले.