‘आता तरी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी नेभळटपणा सोडून मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध ठराव मांडावा’

नागपूर – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आता तरी नेभळटपणा सोडून आपल्या विधानसभेत कर्नाटकच्या सरकार आणि मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधाचा ठराव मांडावा अशी मागणी करणारे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ‘बेळगावसह सर्व सीमांचे रक्षण करून महाराष्ट्र राज्याने तयार केलेल्या बेळगाव वादाचा निषेध करण्याचा ठराव’ करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री साप चावल्याप्रमाणे गप्प बसले आहेत अशी जोरदार टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.

मराठी भाषिकांवर अन्याय होऊनही महाराष्ट्राचे शिंदे – फडणवीस सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. दिल्लीने डोळे वटारल्यामुळे यांच्या तोंडातून शब्दही बाहेर निघत नाहीये असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

कर्नाटक राज्याच्या येणाऱ्या निवडणुकीतील भाजपचा विजय हा शिंदे – फडणवीस यांना जास्त महत्वाचा वाटत आहे असा खोचक प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.