आपल्याला फसवाफसवीची कामं जमत नाही… आम्ही जे बोलतो ते करतो – जयंत पाटील

सांगली –   या भागात पाण्याची समस्या सोडवण्याचे काम केले जात आहे. ६५ गावांच्या योजनेच्या कामाला गती देण्यात येईल, त्याबाबत आम्ही निर्णय घेतलेला असून लवकर पाण्याचा प्रश्न सुटेल. काही लोकं फसवणूक केल्याचा आरोप आमच्यावर करत आहेत परंतु आपल्याला फसवाफसवीची कामं जमत नाही…आम्ही जे बोलतो ते करतो अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

तुम्ही मला कधीही फोन करू शकता आणि तुमचे प्रश्न सांगू शकता. मी मंत्री नंतर आधी पक्षाचा कार्यकर्ता आहे हेही आवर्जून जयंत पाटील यांनी जनतेला सांगितले. आज सांगली जिल्हयातील जत विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला.

महाराष्ट्रभरात आपला पक्ष वाढवण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे. जत तालुक्यात आपल्या राष्ट्रवादीचा प्रभाव कसा वाढेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या भागात राष्ट्रवादीचा विस्तार होण्यास आता मोठी मदत होईल असेही जयंत पाटील म्हणाले.

आगामी काळात मी पुन्हा जत तालुक्यात येईन तेव्हा आपण पुन्हा एकदा आढावा घेऊ, विविध प्रश्नांचा उहापोह करण्याचे काम केले जाईल व प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

बुथ कमिट्यांवर भर द्या, बुथ कार्यकर्त्यांनी लोकांच्या मदतीला धावून जावं, हे केल्याने आपण लोकांच्या मनात घर करू. बुथ कमिट्या लवकर केल्या तर चांगले होईल असे सांगतानाच इतर पक्षाचे अनेकजण आपल्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू इच्छित आहेत. लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश केला जाईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.