गोव्यात पक्षांतराचा रोग थांबला पाहिजे – चिदंबरम

पणजी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी रविवारी गोव्याची अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर कायदेशीर खाणकाम सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले आणि काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर ३ ते ६ महिन्यांत राज्यात खाणकाम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले.

काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या मुद्यांवर पी. चिदंबरम बोलत होते. यावेळी गोवा प्रभारी दिनेश गुंड राव, जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप, गोवा निवडणुकीसाठी एआयसीसी मीडिया प्रभारी अलका लांबा, प्रकाश राठोड, अविनाश तावारीस, एम के शेख, अमरनाथ पणजीकर, आदी उपस्थित होते.

चिदंबरम म्हणाले की गोव्यासाठी संसाधने शोधण्याची समस्या नसून, समस्या आहे ते संसाधनांच्या वाटपाची. सरकारची स्वतःची संसाधने, केंद्र सरकारच्या महसुलातील वाटा आणि केंद्र सरकारचे अनुदान असे राज्याचा अर्थसंकल्पात तीन मार्ग आहेत. निधीचा स्रोत ही कधीच समस्या नव्हती, परंतु समस्या निधी वाटपाची होती. विवेकी शक्तीने आणि विचारसरणीने निधीचे वाटप केले तर जाहीरनाम्यात ठळक केलेले सर्व मुद्दे 5 वर्षात साध्य करता येतील.’’ असे ते म्हणाले.

राज्याची संसाधने कशी वाढू शकतात याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, गोवा आयटी आणि फार्मास्युटिकल केंद्र झाले तर संसाधने वाढतील. जर एखादी समस्या सोडवण्यात अयशस्वी ठरली तर महसूल कमी होतो. असे ते म्हणाले. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाश्वत कायदेशीर खाणकाम सुरू करू शकतो. परंतु आपण समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे.’’ असा त्यांनी पुनरुच्चार केला, आणि गोव्यातील खाणकाम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले.

एका प्रश्नाला उत्तर देताना पी चिदंबरम म्हणाले की, गोव्यात पक्षांतराचा रोग थांबला पाहिजे आणि पोटनिवडणुकीत पक्षांतर करणाऱ्यांचा पराभव करण्याचे लोकांनी ठरवले तरच ते शक्य आहे. लोकांनी अशा राजकारण्यांना पराभूत केले पाहिजे. असे ते म्हणाले.