पहाटेचा शपथविधी ही तर जाणती भागीदारी आणि मतदारांच्या मताचा अवमान :  आप

Pune –  नोव्हेंबर 2019 चा पहाटेचा शपथविधीची माहिती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना होती असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी काल केला आहे. त्यावर ‘देवेंद्र फडवणीस हे सुसंस्कृत आणि सभ्य आहेत त्यांनी असत्याचा आधार घेऊन असे बोलायला नको होते’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्व शरद पवार यांनी दिली आहे.

यावरून आता आम आदमी पक्षाने या दोन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे. आप नेते मुकुंद किर्दत म्हणाले,  प्रत्यक्षामध्ये 2019 ची विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची युती होती. मतदाराने बहुमताचा कौल या युतीस दिला होता. परंतु त्यानंतर राष्ट्रवादीचे अजित दादा आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी युती करत पहाटेचा शपथविधी केला व तीन दिवस का होईना सत्ता उपभोगली व काही सरकार म्हणून महत्त्वाचे निर्णयही घेतले. त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले व त्यांनी महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता उपभोगली. त्यानंतर अमिषांच्या आधारे फुटीर  शिवसेना गट आणि भाजप यांनी युती करून आता सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे मतदाराने कोणाला मत दिले आणि सत्तेवर कोण आले याचा ताळमेळ राहिलेला नाही.

मतदाराच्या मताचा हा अवमान झालेला आहे, सोयीचे सत्ता कारण हाच यामागचा एकमेव उद्देश आहे. त्यामुळे याच्यात सहभागी झालेले या सर्व प्रस्थापित पक्षांचे नेते हे कुठल्याही अर्थाने सभ्य आणि सुसंस्कृत आहेत असे म्हणता येणार नाहीत. असत्य हाच या प्रस्थापित पक्षांचा आधार राहिला आहे. त्यामुळे पहाटेचा शपथविधी ही तर जाणती भागीदारी आणि मतदारांचा अवमान होता. १४ फेब्रुवारी २०१५ चा बारामतीतील मोदी – पवार व्ह्यालेंटाईन डे आणि नोव्हे २०१९ चा पहाटेचा शपथविधी मतदार विसरणार नाही.असं देखील ते म्हणाले.