राम मंदिराच्या उभारणीने सुरु होणारे नव वर्ष महाराष्ट्रासाठी सुद्धा उत्साहवर्धक असेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath shinde New Year: अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य अशा राम मंदिरात (Ram Mandir) प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिराच्या उभारणीने नव्या वर्षाची उत्साहवर्धक सुरुवात होत असून आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्राची देखील वेगाने प्रगतीकडे वाटचाल होत राहील अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, नव्या वर्षाची सुरुवात प्रभू श्री रामचंद्राच्या जयघोषात होत आहे याचा खूप आनंद आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून अयोध्येत भव्य असं राम मंदिर उभारलं जात आहे. करोडो भारतीयांचं स्वप्न पूर्ण होत आहे. नव्या वर्षाची ही सुरुवात निश्चितच खूप उत्साहवर्धक आहे.

नव्या महाराष्ट्राचे चित्र
आपण सगळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आपापल्या परीनं प्रयत्न करतोय. आपल्याला माहिती आहे की महायुती सरकारने राज्यात दुर्बल, कष्टकरी, कामगार, शेतकरी, महिला यांना डोळ्यासमोर ठेऊन अनेक निर्णय घेतले आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, एकीकडे उद्योग, पायाभूत सुविधा वाढवतांना सामाजिक न्यायाचे निर्णय घेऊन महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. महाराष्ट्राकडे गुंतवणूकदार, उद्योगपतींचं ओढा दिवसागणिक वाढतो आहे. नुकतेच आपण परकीय गुंतवणुकीत परत एकदा देशात पहिल्या क्रमांकावर आलो आहोत. नव्य वर्षात महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या प्रकल्पांची सुरुवात होत आहे. हे प्रकल्प आयकॉनिक असणार आहेत. एमटीएचएल, कोस्टल रोड, मेट्रो, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प सुरु होतील आणि राज्याची वाटचाल वेगानं १ ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे होऊ लागेल असा विश्वास मला वाटतो.

विकासासाठी नव्या संकल्पना सुचवा
मुख्यमंत्री म्हणतात की, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा जागतिक दर्जाच्या करणं यासाठी देखील आपण एक मोठं व्हिजन ठेवलं आहे. ही सगळी वाटचाल एकट्याने नाही तर आपल्या सगळ्यांच्या सहभागानं आणि योगदानानं होणार आहे. विकासासाठी आपण नव्या संकल्पना सुचवा, आपले विचार नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरतील.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’