नातीपासून आजीपर्यंत पुणेकर महिलांनी फस्त केली ५ हजार प्लेट पाणीपुरी

प्रल्हाद गवळी मित्र परिवार तर्फे आयोजन; तब्बल ३ हजार ५०० महिलांचा मोठा सहभाग

पुणे : कुटुंबाची जडणघडण करीत संस्कारांसह चांगले नागरिक घडविण्याकरिता सतत तत्पर असलेल्या घरातील महिलांसाठी म्हणजेच अगदी नाती पासून ते आजी पर्यंत सर्वांसाठी पुण्यामध्ये पाणी पुरी खाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कसबा पेठेत झालेल्या या स्पर्धेत ३ हजार ५०० महिलांनी सहभाग घेत चक्क ५ हजार प्लेट पाणीपुरी फस्त केली.

प्रल्हाद गवळी मित्र परिवार तर्फे कसबा पेठेतील आर.सी.एम.गुजराथी हायस्कूल येथे महिलांसाठी पाणी पुरी खाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, कल्याण भेळ चे रमेश कोंढरे, माजी आमदार दीपक पायगुडे, माजी नगरसेविका सुशीला नेटके, संगीता तिकोने, पुष्पा कनोजिया, मनसे महिला शहराध्यक्ष वनिता वागस्कर, अजय सरपोतदार, आयोजक प्रल्हाद गवळी आदी उपस्थित होते. अगदी सहा वर्षाच्या चिमुकलीपासून ते ऐंशी वर्षाच्या आजींपर्यंत सर्वच वयोगटातील महिलांनी यामध्ये सहभाग घेतला.

प्रल्हाद गवळी म्हणाले, महिलांना मनसोक्त पाणी पुरी खाण्याचा आनंद मिळावा, याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला. सर्वसामान्य महिला चूल आणि मुल यासोबतच आपले कुटुंब याभोवती बहुतांश वेळ असतात. त्यांना वेगळ्या प्रकारचा आनंद देता यावा आणि सर्व वयोगटातील, क्षेत्रातील महिलांनी एकत्र यावे, यासाठी स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये विविध प्रकारचे लकी ड्रॉ व बक्षीसे देखील देण्यात आली.

केवळ महिलांसाठी पाणी पुरी खाण्यासारखा वेगळा कार्यक्रम घेतल्याचा आनंद आहे. त्यानिमित्ताने आम्ही सर्व महिला एकत्र आलो. नेहमी कुटुंबासोबत विविध ठिकाणी जाणे होते, मात्र मैत्रिणींसमवेत या स्पर्धेत सहभागी होताना वेगळा अनुभव आल्याचे महिलांनी यावेळी सांगितले.