तोंडावर बंधनं घाला, चोमडे कोण आणि चाटू कोण…; नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात जुंपली

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. यानंतर राष्ट्रवादीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. मात्र आता शरद पवारांच्या या निर्णयाचा परिणाम आता महाविकास आघाडीत दिसून येत आहे. शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावरुन आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि संजय राऊत यांच्यात जुंपली आहे.

संजय राऊत म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये मल्लिकार्जुन खर्गे हे अध्यक्ष असले तरीही निर्णय मात्र राहुल गांधी घेत असतात. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरुन नाना पटोलेंनी त्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. “संजय राऊतांनी ही चोमडेगिरी बंद केली पाहिजे. मग उद्या निर्णय उद्धव ठाकरे नाही संजय राऊत घेतात असं म्हणलं जाईल का? आम्ही वारंवार सांगितलं आहे, आमच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत नाहीत,” अशा शब्दांत नाना पटोलेंनी ठाकरे गटाच्या खासदारांना सुनावले आहे.

यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले,”चाटूगिरी कोण करतंय हे येणारा काळ ठरवेल. शिवसेना कधीही अशी भूमिका घेणार नाही. आपण महाविकास आघाडीत आहात. आपण आपल्या तोंडावर बंधनं घाला. आम्ही तुमच्याविषयी बोलायला लागलो की, चोमडे कोण आणि चाटू कोण याचा खुलासा होईलच,” असं ते म्हणालेत.