प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातच उपलब्ध

पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी एम किसान) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास २ हजार रुपये हप्त्याप्रमाणे प्रती वर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

या योजनेअंतर्गत १४ व्या हप्त्याचा लाभ माहे मे किंवा जून मध्ये जमा होणार असून केंद्र शासनाने १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. राज्यात सद्यस्थितीत १२ लाख ९१ हजार लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधारक्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थीच्या खात्यात १४ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.

यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांक इत्यादीच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडीया पोस्ट पेमेंट बँकत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे. हे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासात जोडले जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबी मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थीना इतरत्र जाण्याची गरजही पडणार नाही.

पी. एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थीची बँक खाती आयपीपीवी मध्ये उघडून तो आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थीना संपर्क करून आयपीपीबी मध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबर मार्फत १५ मे २०२३ पर्यंत गाव पातळीवर सर्वत्र मोहिम राबविण्यात येत आहे.

आयपीपीबी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थीनी त्यांचे बँक खाते उघडून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषी आयुक्त चव्हाण यांनी केले आहे.