घाणेरडे राजकारण करत वैयक्तिक फायद्यासाठी एका मुलीचं आयुष्य चित्रा वाघ यांनी उध्वस्त केले – चाकणकर 

पुणे : शिवसेना (Shivsena) उपनेते आणि किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik Rape case) यांच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणाने  नाट्यमय वळण घेतले आहे. या प्रकरणातील पिडीत तरुणीने मोठा गौप्यस्फोट करत मदतीसाठी उभा राहिलेल्या भाजपच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत.

पीडितेनं आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप पीडितेनं केला आहे. तसंच पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला चित्रा वाघ यांनी भाग पाडलं, असाही खळबळजनक आरोप तिनं केला आहे. महम्मद अहमद अंकल (चाचा) आणि चित्रा वाघ यांनी हे सर्व प्रकरण घडवून आणले असल्याचा खुलासा पीडित तरुणीने केला आहे. याशिवाय विशिष्ट यंत्रणेद्वारे माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईलवरुन मला मेसेज येत आहेत, असाही दावा या पिडीत तरुणीने केला आहे.

त्याचसोबत काल भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीने आपल्याला एक पत्र आणून दिले असून ते पोलिसांना देण्याची जबरदस्ती आपल्यावर करण्यात येतं असल्याचेही तरुणीने म्हटले आहे. हे पत्र कुचिक यांनी दिल्याचे भासवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे, असा खळबळजनक आरोपही या पीडित तरुणीने केला आहे. दरम्यान, पिडीत तरुणी अशी अचानक माध्यमांमध्ये येवून वाघ यांच्यावर आरोप करण्यामागे नेमकं काय कारण आहे याबाबत अनेक शंका उपस्थित होऊ लागल्या आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला आता राजकारण देखील यावरून होऊ लागले असून ‘शेवटी ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ झालं. स्वत: च्या राजकारणाच्या हव्यासापोटी पीडित मुलीचे आयुष्य उद्धवस्त केलं आहे. मंदीत संधी साधणारे हे लोक आहे’ अशा शब्दांत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी चित्रा वाघ (Chitra Wagh)  यांना टोला लगावला आहे. तसंच, रघुनाथ कुचिक प्रकरणातील धागेदोरे तपासून कडक कारवाई केली जाईल, असंही चाकणकर यांनी स्पष्ट केलं.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तात, ‘राज्य महिला आयोगाच्या वतीने पीडितेला पूर्ण न्याय दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी त्या पीडितेचा मला फोन करून बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिची लवकरच भेट घेणार आहे. पण, या प्रकरणात काही धागेदोरे आहे, कुठल्या व्यक्तीला बदनाम करत आहे, याची माहिती घेऊन कडक कारवाई केली जाईल असंही रुपाली चाकणकर यांनी ठणकावून सांगितलं. तसंच, ‘घाणेरडे राजकारण करत वैयक्तिक फायद्यासाठी एका मुलीच आयुष्य चित्रा वाघ यांनी उध्वस्त केले अशी टीकाही रूपाली चाकणकर यांनी केली.