राज साहेब … देशाला खरा धोका तुमच्यामागे ED लावणाऱ्यांपासून आहे – यशोमती ठाकूर

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर तसेच महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या ढोंगीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या नावाखाली मतदारांची कशी फसवणूक झाली हे सप्रमाण सांगितले. सोबतच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे ठामपणे हिंदूंच्या बाजूने आपण उभे राहणार आहोत असे देखील संकेत दिले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था आदी प्रश्नांवरून महाविकास आघाडीचे वाभाडे काढले.

दरम्यान, राज यांनी केलेली टीका महाविकास आघाडीला चांगलीच झोंबली आहे. काँग्रेस नेत्या आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (yashomati Thakur )यांनी ट्विट केलंय की,  राज ठाकरे यांच्या माहितीसाठी देशात गॅस, पेट्रोल-डिझेल यांच्या किंमती वाढल्याने सामान्य माणसाचं जगणं मुष्कील झालं आहे. देशाला खरा धोका तुमच्यामागे ‘ED’ लावणाऱ्यांपासून आहे. खरा धोका ओळखा. बाकी गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा.