जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल; संजय राऊत यांनीही शिंदे यांच्यापुढे आता गुडघे टेकले ?

Mumbai – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या ३४ सोबतच ७ अपक्ष अशा एकुण ४१ आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. शिंदे यांनी दिलेल्या दणक्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे महाविकास आघाडीला पाठींबा देणारे अनेक अपक्ष सुद्धा आता भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेऊ लागले आहेत.

राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार (Thackeray Gov) अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार असल्याची चर्चा आहे. शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भूमिकाही आता समोर आली आहे. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपसोबत (BJP) जाण्यास हे नेते इच्छुक आहेत अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, यासर्व घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल, सत्ता पुन्हा मिळवता येते, पण पक्षाचीही प्रतिष्ठा असते, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच, एकनाथ शिंदे यांच्याशी आज सकाळीच फोनवरुन तासभर चर्चा झाली. झालेल्या चर्चेती माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देण्यात आल्याचंही संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदेंना पक्ष सोडणं सोपं नाही आणि आम्हालाही त्यांना सोडणं सोप नाही, असंही ते म्हणाले. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल असं रौ यांनी म्हटलं आहे.