आम्ही बांधलेली राजकीय बांधणी अजिबात विस्कळीत होणार नाही  – शरद पवार

नाशिक  – मध्यावर्ती निवडणुका होतील अशा चर्चेला उधाण आले असताना उद्या जरी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार आहोत असे सांगतानाच निवडणुका होणार नसतील तरी राज्य एकंदर कोणत्या परिस्थितीत चाललं आहे त्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. काही कमतरता आणि चुका असतील त्यासंबंधीची भूमिका त्या-त्या वेळी घेतली जाईल त्यामुळे आम्ही बांधलेली राजकीय बांधणी अजिबात विस्कळीत होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

दरम्यान ज्यावेळी लोकांना कौल देण्याची संधी मिळेल त्यावेळी हे चित्र बदलेल असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले. राज्यकर्त्यांनी प्राधान्य कशाला द्यायचे हा विचार करायला हवा. राज्यकर्त्यांनी संकटग्रस्त लोकांच्या वेदना जाणून घेण्याची आवश्यकता असते, मात्र आजच्या राज्यकर्त्यांचे प्राधान्य दुसरेच आहे असे मतही शरद पवार यांनी नोंदवले. शरद पवार हे आज नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार ज्या परिसरात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, लोक संकटात आहेत अशा ठिकाणी दौरे करत आहेत. स्वागतासाठी, सत्कारासाठी विरोधी पक्ष नेत्यांचे दौरे नाहीत. यातून कोणी काय बोध घ्यायचा हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

ओबीसी आरक्षणाबाबतचा निर्णय हाती आल्याशिवाय भाष्य करणे योग्य नाही. परंतु प्रथमदर्शनी वाचनानंतर परिस्थिती चिंताजनक आहे. ओबीसी हा मोठा वर्ग या संबंध सत्तेच्या आणि प्रशासनाच्या बाहेर फेकला जाईल अशी चिंता शरद पवार यांनी व्यक्त केली. आगामी निवडणुकांसंबंधीचे स्पष्ट चित्र समोर येण्याची गरज आहे. आमची इच्छा आहे की सहकारी पक्षांशी एकत्रित लढण्याच्या मुद्द्यावर चर्चा करावी, चर्चा करून एकत्रित लढण्याचा निर्णय झाला तर चांगले होईल, असेही शरद पवार म्हणाले.

नव्या सरकारच्या स्थापनेनंतर अजूनही खातेवाटप होत नाही, असा प्रश्न माध्यमांकडून विचारला असता, नव्या सरकारचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना ते काम समर्थपणे चालवू शकतील असा आत्मविश्वास आहे, त्यामुळे काम चालू आहे, असा टोलाही शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.