बीकेसी मैदानावर पाचपट जास्त गर्दी जमवण्याचा शिवसेनेचा निर्धार; कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिकांचा उसळणार जनसागर

मुंबई :- शिवसेना(Shivsena) मुख्यनेते(chief leader) आणि मुख्यमंत्री(chief minister) एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांच्या नेतृत्वाखाली बीकेसी मैदानावर भव्य दसरा(Dussehra) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन लाखो शिवसैनिक बीकेसी मैदानात जमणार आहे. शिवतीर्थची क्षमता 80 हजार एवढीच असल्याने बीकेसी मैदानावर त्यापेक्षा पाचपट जास्त गर्दी जमवण्याचे नियोजन पक्षकार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि गुरुवर्य धर्मवीर आंनद दिघे यांची शिकवण अंगिकारून हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे शिवसेनेचे मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेळाव्यात नक्की काय बोलणार, कोणते नवीन गौप्यस्फोट करणार, कुणाकुणाला पक्षात प्रवेश देणार याबाबत सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील कानाकोपऱ्यातील अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांचे हात अधिक बळकट करण्याचा निर्धार करून पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळेच काहीही करून बीकेसी मैदानावर जाऊन हा मेळावा प्रत्यक्ष पहायचाच असा निश्चय या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. यासाठीच राज्यभरातील लाखो शिवसैनिक मिळेल त्या वाहनाने मुंबईकडे निघाले असून बीकेसी मैदानावरच आजवरचे सगळे रेकॉर्डब्रेक गर्दी जमेल असा दावा अनेक राजकीय विश्लेषक आतापासूनच करत आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी खरी निष्ठा बाळगणारे आणि दसरा मेळाव्यात त्यांच्या मुखातून अनुभवायला मिळणारा हिंदुत्वाचा हुंकार अनुभवायचा असेल तर बीकेसी मैदानात जमायला हवे अशी चर्चा शहर आणि ग्रामीण भागात नाक्यांनाक्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली होती. त्यांचच प्रत्यक्ष चित्र दसरा मेळाव्यात अनुभवायला मिळेल यात शंका नाही.

नुसती टोमणेबाजी आणि दुसऱ्यावर टीका करण्यात वेळ न दवडता पदभार स्वीकारल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले आहे. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, मराठा तरुण तरुणी, एसटी कर्मचारी यांचे अनेक खोळंबून पडलेले प्रश्न त्यांनी तातडीने सोडवले आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र येथील अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. आपल्या सोबत आलेल्या 50 आमदारांच्या मतदारसंघातील बहुतेक प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना भाजप युती सरकारला येत्या 7 ऑक्टोबर रोजी 100 दिवस पूर्ण होत असल्याने राज्याच्या विकासाबाबत त्यांची असलेला त्यांचा दृष्टिकोन देखील ते आपल्या भाषणातून मांडतील याची सगळ्यांना खात्री आहे.

शिवसेनेला पुढे घेऊन जाण्यासाठी इतर राज्यातील 13 प्रदेश प्रमुखांनीही एकनाथ शिंदे यांना पूर्वीच पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे राज्यासह राज्याबाहेरही पक्षाची मजबूत बांधणी करता यावी यासाठी आवश्यक असलेल्या विचारांचे खरे सोने लुटण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून होईल यात शंका नाही.