‘कायद्याचा अभ्यास करून सरकार स्थापन केलंय, हे सरकार आपला कार्यकाळ तर पूर्ण करणार’ 

 नाशिक – नाशिक येथे नुकतीच भारतीय जनता पार्टीची(BJP)  प्रदेश पदाधिकारी बैठक पार पडली. या कार्यक्रमातून भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis)ठाकरे गटासह महाविकास आघाडीवर (MVA) जोरदार हल्लाबोल केला आहे. आज जे महाराष्ट्रात सरकार आलंय, ते गद्दारांचं सरकार नसून खुद्दारांचं सरकार आहे. हिंदुत्वासाठी ज्यांची खुद्दारी आहे, ज्यांची विचारांसाठी खुद्दारी आहे असं हे सरकार आहे अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, गद्दारांना खाली पाडून आपल्या सोबत खुद्दार आले आणि आपण महाराष्ट्रात नवं सरकार उभं केलं. म्हणून खुद्दार आपल्या सोबत आहेत. शिवसेनेच्या उरलेसुरल्यांना थांबवण्यासाठी सर्व सुरू आहे. हे बेकायदेशीर आहे, ते बेकायदेशीर आहे, मी सांगतो आपण जे केलं आहे ते नियमात आहे, कायद्यात आहे. सर्वोच्च न्यायालयात आपल्या बाजूने निकाल येईल, हे मी ठासून सांगतो, असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, काहीही काळजी करू नका. आपण जे केलंय ते नियमाने केलंय. कायद्याने केलंय. कायद्याचा अभ्यास करून केलंय. मला पूर्ण विश्वास आहे, सर्वोच्च न्यायालयात निश्चितपणे आपल्याच बाजुने निकाल लागेल. कारण आपण संविधानासंमत राहून काम केलंय. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजुने निकाल दिला, तर सर्वोच्च न्यायालय उत्तम आहे. पण न्यायालयाने त्यांच्याविरोधात निकाल दिला, तर न्यायालय दबावाखाली आहे. निवडणूक आयोगाबद्दलही त्यांनी असंच म्हटलं आहे. देशातील सर्वोच्च संस्थांवर प्रश्नचिन्ह उमटवण्याचं काम विरोधकांकडून केलं जात आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde )  यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं सरकार १०० टक्के कायदेसंमत आहे. ते संविधान संमत आहे. हे सरकार आपला कार्यकाळ तर पूर्ण करणारच आहे. पण पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्रात नव्याने दीडपट अधिक जागा जिंकून येणार आहोत. कारण आम्ही जनतेची सेवा आम्ही करत आहोत.” असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.