हनुमान चालीसाची ताकद आमच्या मागे आहे त्यामुळे शिवसैनिक आम्हाला काही करू शकणार नाहीत

मुंबई – राज्यात सध्या भोंगे आणि त्याबरोबर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) जोरात चर्चेत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray ) यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असताना अमरावतीचे राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. आज खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी पत्रकार परिषद घेत आपले मुद्दे मांडले. उद्या मातोश्रीवर ( Matoshri ) जाऊन ते  हनुमान चालिसा पठण करणार आहेत असं यावेळी त्यांनी ठणकावून सांगितले. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

रवी राणा म्हणाले,  100 धमक्या दिल्या तरी आम्ही घाबरणार नाही आहोत, बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) हे असते तर त्यांनी आमचे स्वागत केले असते. शिवसेनेला बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे. हनुमान जंयती दिवशी मुख्यमंत्री यांनी हनुमान मंदिरात प्रार्थना केली नाही, त्यांनी हनुमान चालीसा वाचावी. आम्हाला नाव स्मरण करण्यासाठी, हनुमान चालीसा पठण करण्यास कोणीही रोकू शकत नाही. असे राणा दाम्पत्यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

दरम्यान, यावेळी नवनीत राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) महाराष्ट्र कोणत्या दिशेने नेत आहेत? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकून मोठे झालो आहोत. राजकारणात विचारधारा जिवंत ठेवली पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी पदासाठी आपली विचारधारा मरू दिली नाही. बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण करूनच आम्ही हनुमान चालीसा म्हणणार आहोत. हनुमान चालीसाची ताकद, संकटमोचकाची ताकद आमच्या मागे आहे त्यामुळे शिवसैनिक आम्हाला काही करू शकणार नाहीत असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. मातोश्रीच्या बाहेर आम्ही जाणार आणि त्या ठिकाणी आम्ही हनुमान चालीसा वाचणारच आहे.