उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेची घंटा वाजणार, विद्यार्थ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी निर्णय

पुणे : कोरोनामुळे 2 वर्षांपासून शाळा बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. आता हेच नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी आता अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

22 मार्च 2022 रोजी एक शासन निर्णय पारित केला आहे. त्यानुसार शाळा पूर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. बऱ्याच पालकांनी ऑनलाईन शिक्षणाचे तोटे होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत तर मुलांची गणित आणि भाषा विषयांमध्ये पीछेहाट होत असल्याचं निरीक्षण अनेक शिक्षकांनी देखील नोंदविले आहे. त्यामुळे या दोन महिन्यात शक्य होईल तेवढे नुकसान भरून काढू. असे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सांगितलं आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून  शाळा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता शाळा सुरू झाल्या असून अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक देखील मागणी करत होते. त्यानुसार एप्रिल महिना आणि रविवारीही शाळा सुरु राहणार आहेत.

विद्यार्थ्यांच शालेय नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे यंदा मात्र विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त अभ्यासच करावा लागणार आहे.