फडणवीस-शिंदे सरकार है बेलगाम सत्ताकारणाचे जिवंत उदाहरण – सामना

मुंबई – राज्यात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आता राज्यात सत्तांतर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोर आमदार, अपक्ष आमदार आणि भाजपच्या (BJP) मदतीने नवे सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, या बंडाच्या भूकंपाचे अजूनही धक्के शिवसेनेला बसत असून अनेक नेते आता शिंदे गटात सामील होत आहेत.

या पार्श्वभूमीवर घटनात्मक पेचावर लक्ष वेधताना आता याप्रकरणी तातडीनं निकाल लावणं गरजेचं असल्याचं मत सामना (Saamana) अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं. तसंच फडणवीस-शिंदे सरकार है बेलगाम सत्ताकारणाचे जिवंत उदाहरण आहे, असं म्हणत निशाणा साधण्यात आलाय.शिवसेनेचं (Shiv sena News) मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर (Eknath Shinde – Devendra Fadnavis Government) टीका करण्यात आली आहे.

यासोबत न्याय मरणार नाही, न्याय होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. आज होणारा सुप्रीम कोर्टातील (Supreme Court ) निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. आता फैसला कधीही झाला, तरी विजय सत्याचाच होईल, अशी खात्री महाराष्ट्राच्या जनतेला असल्याचंही सामना अग्रलेखात म्हटलंय. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार हे बेकायदेशीरपणे लादले गेल्याची टीकाही करण्यात आली आहे. यावेळी राज्यपालांनाही अग्रलेखातून टोला लगावण्यात आला आहे.