कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणुकांचे युद्ध आपल्याला जिंकायचे आहे – अजित पवार

Ajit Pawar:- कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि या कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणुकांचे युध्द आपल्याला जिंकायचे आहे असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात व्यक्त केला.

मुंबईमध्ये पक्ष ज्यापध्दतीने वाढायला हवा होता. तशाप्रकारचा पोचला नाही. आमचं लक्ष फक्त ग्रामीण भागाकडे राहिले. आता समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जे काम सुरू आहे त्यातून आपल्याला नक्कीच बळ मिळेल असेही अजित पवार म्हणाले.

आता आपल्याला वेळ कमी आहे. सुरुवात चांगली झाली आहे त्यामध्ये सातत्य ठेवा. काम करताना खटका उडत असतो मात्र तो समजून घेऊन काम करा. ज्याला पद देत आहात किंवा देणार आहात त्यांची प्रतिमा त्याच्या विभागात चांगली आहे का याचाही विचार करा असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आठवडयातील एक दिवस आपल्या आमदारांना वेळ द्यायला सांगेन. कार्यकर्ते कामाला लागले की काय होते हे आज दिसले. शिवसेना फक्त मुंबईत होती त्यानंतर ती कोकणात पोचली. आपल्यातही ती जिद्द आहे आपणही तसे काम सुरू करु. मला सांग सकाळी मुंबईतील वेगवेगळ्या भागात येतो. लोकहिताच्या कामांची पाहणी करतो. या मुंबापुरीला एक रुपयाचा निधी कमी पडू देणार नाही असा शब्दही अजित पवार यांनी दिला.

धारावीतील टेंडरमुळे एका उद्योगपतीला फायदा होणार आहे अशी बोंब मारली जात आहे. त्याच्या खोलात जाऊन माहिती घेऊ. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे. प्रश्न सोडविण्याची ताकद आणि धमक आपल्यात आहे. काहीजण आज करतो उद्या करतो सांगत असतात अरे काय देवळातील घंटा आहे का ती असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

महायुतीच्या माध्यमातून सरकार राज्यात काम करत आहेत. मुंबईत विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकेत योग्य ती आणि म्हणावी अशी संख्या गाठू शकलो नाही. आपल्या वॉर्डात निवडणूक लढणार्‍या व्यक्तीच्या पाठीशी ताकद उभी करायला हवी असेही मत अजित पवार यांनी मांडले.

अल्पसंख्याक, ओबीसी, मागासवर्गीय या समाजांना निधीची कमतरता भासू दिली नाही. आपण वंचित व बहुजनांकरता काम करत आहोत हेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले.

चांद्यापासून बांद्यापर्यंत जास्तीत जास्त जागा निवडून कशा येतील असा प्रयत्न करायचा आहे. हे राज्य माझे आहे, सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे हा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस जनतेला काम करताना देत आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

समीरभाऊंच्या पाठीशी उभे राहून एकदिलाने काम केले तर पक्षाची ताकद मुंबईत उभी राहिल. एक एक पायरी म्हणजे कार्यकर्ता असतो. तो नेत्याला जोडणारा दुवा असतो. सर्व जाती धर्माच्या लोकांचा आपण आदर करतो. सर्व सणांमध्ये सहभागी होतो. हे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पुढे आले पाहिजे. सत्तेकरता आम्ही सत्तेत गेलो नाही. सर्व सामान्य लोकांची कामे व्हायला हवी त्याकरता निर्णय घेतला. विरोधाला विरोध करायचा, मोर्चे काढायचे, यातून प्रश्न सुटणार आहे का? असा सवालही अजित पवार यांनी विरोधकांना केला.

स्वतः ची प्रसिद्धी करण्यासाठी मी काम करत नाही किंवा सोशल मिडियावर पोस्ट करत नाही. पहाटे उठून लोकांची कामे कशी होतील असा माझा प्रयत्न असतो असेही काहींचे नाव घेता टोला अजित पवार यांनी लगावला.

मुंबईत २४ वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस वाढली नाही त्याच्या कितीतरी पटीने समीरभाऊच्या नेतृत्वाखाली वाढेल त्यासाठी सरकारची ताकद उभी करु. आम्ही तुमच्यासोबत आहोत असा शब्दही अजित पवार यांनी दिला.

मुंबई शहरावर लक्ष केंद्रित केले तर परिस्थिती आपल्या बाजूने येऊ शकते – प्रफुल पटेल

तुमच्यासोबत आम्ही आहोतच. मात्र मुंबई शहरावर लक्ष केंद्रित केले तर परिस्थिती आपल्या बाजूने येऊ शकते असा विश्वास राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

या षण्मुखानंद सभागृहाचे आणि पक्षाचे एक वेगळे नाते आहे. इथल्या बैठकीत अजितदादा पवार यांनी एल्गार पुकारला होता. त्यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद अजितदादा पवार यांना राज्यातून मिळाला होता. राज्यातील प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी अजितदादा पवार यांच्या पाठीशी आहे हे सिध्द झाले आहे असेही प्रफुल पटेल म्हणाले.

१९९१ मध्ये अजितदादा आणि मी एकत्र लोकसभेत होतो हे सांगतानाच अजितदादा पवार यांनी पक्षाची ताकद वाढवण्याचे काम केले हे स्पष्टपणेच प्रफुल पटेल यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईकडे लक्ष कमी राहिले आहे. वारंवार कॉंग्रेसच्या सोबत राहिलो त्यामुळे कमी जागा लढवायचो. पसंतीच्या जागा कधीच मिळत नव्हत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांनी ग्रामीण भागात वाढवली आहे. आता शहराकडे अजितदादा पवार यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी शहराकडे लक्ष घातले असल्याने त्यादृष्टीने काम करायचे आहे. समीरभाऊ यांनी काम सुरू केले आहे त्यामुळे आज आज खरी लोकं सभागृहात दिसत आहेत असेही प्रफुल पटेल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळवर होता दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आता झोपेतही वजन कमी करता येणार! जाणून घ्या Weight Lossच्या सोप्या टिप्स

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आपल्याला मंत्रीपदच काय आमदारकीची सुद्धा फिकीर नाही – मंत्री भुजबळ