अमृत संस्था स्थापन झाल्यापासून तिला निधी दिला गेला नाही तेव्हा भुजबळ साहेब का शांत होते ?

पुणे – – खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील युवक युवतींना व इतर उमेदवारासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी म्हणजेच अमृत या संस्थेची निर्मिती केलेली आहे. महाविकास आघाडी सरकारने या संस्थेचे मुख्यालय नाशिकला मंजूर केले होते. मात्र शिंदे सरकारने लगेच नाशिकचे मुख्यालय पुणे येथे स्थलांतरित केले. हे अमृतचे मुख्यालय नाशिकहून पुण्याला नेण्याचे कारणच काय असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित करत हा प्रश्न अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, नव्याने सरकार स्थापन होताच नाशिकचे प्रकल्प पळविण्याचा हा सिलसिला पुन्हा एकदा सुरू झाला असून आता खऱ्या अर्थाने नाशिकची प्रगती सुरू झाली आहे असा उपहासात्मक टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. तसेच नाशिकमध्ये अमृतचे मुख्यालय मंजूर करण्यात आले असतांना ते पुण्याला हलविण्याचे कारणच काय असा सवाल उपस्थित करत येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत सरकारची यामागे भूमिका काय याबाबत विचारणा केली जाईल असे त्यांनी नाशिकमध्ये बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, भुजबळ यांच्या या वक्तव्याचापरशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी समाचार घेतला आहे. ते म्हणाले, अमृत संस्थेचे मुख्यालय पुण्याला का स्थलांतरित केले असा छगन भुजबळ यांनी विचारला होता त्यावर संस्था स्थापन झाल्यापासून तिला निधी दिला गेला नाही तेव्हा भुजबळ साहेब का शांत होते असा प्रतिप्रश्न परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी विचारला आहे.