संजय राऊत यांना घाबरण्याचे कारण काय? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

नागपूर : घाबरलेला व्यक्ती खोटेनाटे आरोप करून जनतेचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो तसे आता सुरू आहे. संजय राऊत यांना घाबरण्याचे कारण काय? त्यांना न्यायालय खुले असून, तेथे ते दाद मागू शकतात अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मालमत्तेच्या विरोधात ईडीने (ED) केलेल्या कारवाईसंदर्भात आ. चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. ईडी देशातील प्रतिष्ठित तपास संस्था आहे. या यंत्रणा कायद्याने काम करतात. त्यामुळे ईडीच्या कार्यप्रणालीवर कोणत्याही राजकीय पक्षाचे लेबल लावणे चुकीचे ठरेल असे मत आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

पुढे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ईडीने मालमत्तेवर कारवाई केली म्हणून खा. संजय राऊत यांना घाबरण्याचे कारण नाही. घाबरलेला व्यक्ती खोटेनाटे आरोप करून जनतेचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो. ईडीच्या कारवाईविरोधात संजय राऊत न्यायालयात दाद मागू शकतात, न्यायालयाचे दरवाजे त्यांच्यासाठी कायम उघडे आहेत.