जीवनात सर्वकाही कमावलं पण लग्नाच्या बेडीत अडकायचं राहून गेलं; जाणून घ्या रतन टाटा का आहेत अविवाहित?

Ratan Tata Special Story: भारताचे अनमोल रत्न, रतन टाटा (Ratan tata) हे केवळ एक यशस्वी उद्योगपती नाहीत तर दयाळू व्यक्तीही आहेत. माणूस म्हणून ते खूप मोठे आहेत. आलिशान घर, चिक्कार पैसा, महागड्या गाड्या असं सर्वकाही असतानाही रतन टाटा यांनी आजपर्यंत लग्न का केले नाही?, असा प्रश्न सर्वांना पडतो. सोशल मीडियावर तर बऱ्याचदा या विषयावर जोरदार चर्चा रंगतात. या विशेष लेखात आम्ही रतन टाटा यांच्या लग्न न करण्यामागच्या कहानीवर प्रकाश टाकणार आहोत. (Why Ratan Tata Not Married)

रतन टाटा (Ratan Tata Love Story) आज ८५ वर्षांचे आहेत. त्यांनी आयुष्यात सर्वकाही मिळवलं, पण स्वत:च छोटसं आणि छानसं कुटुंब मात्र ते बनवू शकले नाहीत. एकदा ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’शी बोलताना त्यांनी आपल्या लग्न न करण्यामागच्या कारणाचा खुलासा केला होता. तरुणाईत आपल्यालाही एका मुलीवर प्रेम झाले होते. तिच्यासोबत लग्न करण्याचीही आपली तयारी होती. मात्र एका कारणामुळे आमचे लग्न होऊ शकले नाही आणि तेव्हापासून मी विनालग्नाचे जीवन जगत असल्याचा गौप्यस्फोट रतन टाटांनी केला होता.

ते सांगतात, ‘तो काळ खूप सुंदर होता. हवामानही प्रेमळ होते. माझ्याकडे गाडी होती. आवडती नोकरीही होती. त्याच शहरात मी माझ्या आवडत्या मुलीला भेटलो आणि तिच्या प्रेमात पडलो. पण एके दिवशी माझ्या आजीची तब्येत बरी नसल्यामुळे मी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मी माझ्या प्रेयसीशी लग्नही करण्याचा निश्चय केला होता. मला ज्या मुलीशी लग्न करायचे आहे तीही माझ्यासोबत भारतात येईल या विचाराने मी परतायचे ठरवले. परंतु तिच्या घरच्यांनी नकार दिला. १९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धानंतर तिच्या पालकांना तिने भारतात यावे असे वाटत नव्हते. अशा प्रकारे आमचे नाते तुटले’, असे त्यांनी म्हटले.