गद्दार म्हणू नका असे निरोप पाठवले जातात; आदित्य ठाकरेंचा घणाघात 

रत्नागिरी : शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट हा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहेत. यातच आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे रत्नागिरी (Ratnagiri) दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीमध्ये आयोजित सभेमध्ये त्यांनी शिंदे गट आणि भाजपावर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. गद्दार म्हणू नका असे निरोप पाठवले जातात, पण खोके सरकारला गद्दार नाही तर आणखी काय म्हणायचे असा घणाघात यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

राज्यात घाणेरडं राजकारण सुरू आहे. डबल इंजिन सरकार असताना प्रकल्प राज्याबाहेर गेला. गद्दार सरकारला विकास कामांची माहिती नाही. हे गद्दारांचं घटनाबाह्य सरकार आहे. ते खोक्यासाठी सरकार पाडल्याचं मान्यही करतात असा हल्लाबोलही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. स्वत:साठी खोके महाराष्ट्रासाठी धोके हेच या सरकारचे सत्य असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.