Breaking: जितेंद्र आव्हाड यांना१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

ठाणे: ‘हर हर महादेव’ सिनेमाच्या निषेधार्थ ठाण्यातील चित्रपटगृहात राडा घालणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना चांगलेच भोवले आहे. आज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  आव्हाड आता आजच उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे सूत्रांनी सांगितंले.

ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आज आव्हाड यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायाधीश डी. एस. पाल यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी आव्हाड यांच्यासह अकरा जणांना कोर्टात हजर करणार आले होते. आव्हाड यांच्यावर एकूण सात कलमं वर्तक नगर पोलिसांनी मारहाणीच्या आरोपाखाली लावली आहेत.

का करण्यात आली जितेंद्र आव्हाड यांना अटक?
दरम्यान हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आक्रमक भूमिका घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार आव्हाड (Jitendra Awhad) आणि कार्यकर्त्यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा चालू शो बंद पाडला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहातील सर्व लोकांना बाहेर काढले होते. उपस्थित प्रेक्षकांपैकी काहींनी त्यांना विरोधही दर्शवला होते. यादरम्यान विरोध दर्शवणाऱ्या एका प्रेक्षकाला कार्यकर्त्यांनी मारहाण देखील केल्याची दृश्ये पुढे आली होती.

याचमुळे आव्हाड यांना काल वर्तक नगर पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर आव्हाड यांना कालची रात्र पोलिस ठाण्यातील कोठडीतच काढावी लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आव्हाडांच्या अटकेचा निषेध करण्यात आलाय. आव्हाडांना करण्यात आलेली अटक ही सरकार हुकूमशाहीपणे वागत असल्याचा पुरावा आहे, अशी टीका करण्यात आली होती. मुंब्रा आणि ठाणे परिसरात आव्हाडांच्या समर्थकांनी शुक्रवारपासूनही निदर्शनं करत आव्हांडांच्या अटकेविरुद्ध आवाज उठवला होता. आता न्यायालयाच्या या निकालानंतर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.