मुंबई-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरील होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक विभागाने आणला रामबाण उपाय

पुणे  : मुंबई-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान (Katraj Tunnel to Navale Bridge) वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांकरिता ४० कि.मी. प्रतितास वेगमर्यादा निश्चित केल्याचे अंतिम आदेश पुणे शहर वाहतूक शाखेकडून जारी करण्यात आले आहेत.

राज्य शासन गृह विभागाच्या २७ सप्टेंबर १९९६ च्या अधिसूचनेनुसार अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांच्या सूचना व हरकतींवर विचार करुन हे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार टॅक्टर-ट्रेलर कॉम्बीनेशन, ट्रक-ट्रेलर, अर्टीक्युलेटेड व्हेइकल्स, मल्टी ॲक्सल वाहने, कंटेनर, मोठ्या आकाराच्या मालाची वाहतूक करणारी वाहने आदी जड, अवजड वाहनांसाठी ही वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, असेही पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.