महाविकास आघाडीच्या जागावाटप बाबत लवकरच बैठक, पवार यांची माहिती

Sharad Pawar: देशातील मोदी सरकारने (Modi Government) गेल्या नऊ वर्षांमध्ये कुठलेही ठोस काम जनतेसाठी केले नाही आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये जनतेसमोर जाताना ठोस कार्यक्रम नसल्याने राम मंदिराच्या माध्यमातून जनतेमध्ये येऊन वेगळं मत तयार करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहे.

शरद पवार म्हणाले की, राम मंदिर झाल्याचा आनंद आहे, पण बाबरी पडली तेव्हा तिथे केवळ एकच पक्ष होता. एकच नेता सांगत होता ‘बाबरी आम्ही पाडली’ ते बाळासाहेब ठाकरे होते. बाकी कुणी म्हटलं नव्हतं बाबरी आम्ही पाडली म्हणून, त्यामुळे जो काही संघर्ष होता त्यामध्ये शिवसेनेची भूमिका होती की नाही, याबद्दल वाद घालण्यात काही अर्थ नाही. शिवसेनेची भूमिका होती हे आम्ही स्वत: बाळासाहेबांच्या वक्तव्यांमधून ऐकलं होतं. बाबरी पाडण्याची जबाबदारी एकट्या बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, तीन राज्यांचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही, ही गोष्ट मान्य करावी लागेल. पण याचा अर्थ उद्याच्या निवडणुकीला आम्हाला सगळ्यांना अडचणी आहेत, असं अजिबात होत नाही. आज इंडिया आघाडीत आम्ही जे एकत्र आहोत, त्यांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची आवश्यकता आहे. यासाठी खबरदारी घेण्याची आमची तयारी आहे. त्या कामास आम्ही सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात एकत्र लढल्यास आम्हाला यश नक्कीच मिळेल असंही शरद पवार म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी मी प्रयत्न केले आहे. इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीत माझ्या शेजारीच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे बसले होते. मी त्यांना सुचवले की, प्रकाश आंबेडकर यांना एकत्र घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर यावर काही बैठक झाली की नाही? याबाबत मला कल्पना नाही. आमच्या सर्वांची इच्छा आहे की, आंबेडकरांना एकत्र घेऊन निवडणुकीला सामोरे जावे. असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, निवडणुक लढवण्यासाठी चेहऱ्याची आवश्यकता असल्याचं काही कारण नाही. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर न केल्यास काहीही फरक पडणार नाही. १९७७ सालच्या निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी कोणताही चेहरा जाहीर करण्यात आला नव्हता. निवडणुक झाल्यावर मोरारजी देसाई यांची निवड करण्यात आली. देसाईंचा चेहरा वापरून १९७७ सालची निवडणूक लढली गेली नाही. त्यामुळं २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी देखील पंतप्रधान पदासाठी चेहरा जाहीर न केल्यास काही फरक पडणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, यावेळेला अमरावतीचा निर्णय महाविकास आघाडीचे तीनही घटक पक्ष एकत्र बसून घेतील. मागच्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होता. तसेच जिल्ह्यातील आमच्या कार्यकर्त्यांना हा मतदारसंघ पक्षाकडे हवा आहे. त्यामुळे जागावाटपाची चर्चा करताना त्याबद्दल आमची भूमिका मांडू असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, मायावतींचा महत्वाचा रोल उत्तरप्रदेशध्ये आहे. मात्र, आमचा सहकारी पक्ष म्हणजे समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशामध्ये मजबूत आहे. समाजवादी पार्टीला दुखावून आम्ही अन्य कुणाला सोबत घ्यायचा विचार करत नाही, असेही शरद पवार म्हणाले.

संसदेत घुसखोरी झाली. त्यावर प्रश्न विचारले म्हणून खासदारांचे निलंबन करण्यात आले. त्यांची काय चूक होती. सभागृह चालू असताना बाहेरचे लोक येतात आणि गॅस सोडतात त्याची माहिती घ्यायला नको का? संसद सरकार कशा पद्धतीने चालवू पाहतेय याच हे उत्कृष्ट उदाहरण आहे असेही शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

विरोधकांना जनता ४४० व्होल्टचा करंट लावणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

रामदास आठवले यांनी तळागाळातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य प्रेरक आहे – देवधर

मला या स्थितीत आणण्यासाठी खूप धन्यवाद..; कुस्तीपटू विनेश फोगटने पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार केले परत